'आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखेच आहोत,' हसनाळ गाव पाण्याखाली जाण्याला जबाबदार कोण? - ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, 'आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखेच आहोत,' हसनाळ गाव पाण्याखाली जाण्याला जबाबदार कोण? - ग्राऊंड रिपोर्ट
'आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखेच आहोत,' हसनाळ गाव पाण्याखाली जाण्याला जबाबदार कोण? - ग्राऊंड रिपोर्ट

"आम्ही वाचून सुद्धा मेलेलो आहोत. आज आम्ही जिवंत असूनसुद्धा काही अर्थ नाही. आम्हाला अंघोळ करायला जागा नाही."

पत्र्याच्या शेडसमोर अंघोळीसाठी ठेवलेल्या दगडाकडे बोट करत ज्ञानेश्वर जुरावाड बोलत होते.

ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे हसनाळमधील अनेकांच्या वास्तव्यासाठी प्रशासनानं पत्र्याचे शेड बांधून दिलेत. गावातील अनेकांकडे सध्या केवळ एवढं शेडच शिल्लक आहे. त्यांचं बाकी सगळं पाण्यामध्ये वाहून गेलंय.

18 ऑगस्ट 2025 रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं हसनाळ गाव पाण्याखाली गेलं. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला.

आम्ही हसनाळमध्ये पोहचलो, तेव्हा सगळीकडे पडकी घरं दिसत होती. पाण्यामुळे घरांची झालेली नासधूस दिसत होती.

ज्या शाळेत गावातली मुलं जायची, ती शाळाही उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं.

गावात आमची भेट यादव मादाळे यांच्याशी झाली. ते सांगू लागले,"या घरी कमीत कमी 30-35 फूट पाणी होतं. हे जे खांब आहेत ना तेसुद्धा दिसत नव्हते. त्या खांबाच्या वर पाणी होतं.

"घराची अवस्था अशीच आहे. तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागली, अशीच अवस्था आहे. आणि आमची अवस्था पण अशीच आहे सर. आम्हाला कुठलीच मदत भेटली नाही, शासनाचे फक्त 10 हजार रुपये भेटले," यादव पुढे म्हणाले.

हसनाळमधील दुर्घटना ही पूर्णपणे नैसर्गिक नव्हती, तर शासन, लोकप्रतिनिधी आणि अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे ओढवलेलं मानवनिर्मित संकट होतं, असं या घटनेचा अभ्यास करणाऱ्या सत्यशोधन समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.

या अहवालाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. नांदेडमधील सारिका उबाळे या सत्यशोधन अहवाल समितीच्या सदस्य आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आधी पुनर्वसन मग धरण हे तत्व लेंडी धरण प्रकल्पाच्या बाबतीत अजिताबतच पाळलं गेलं नाही. ग्रामस्थांनी घळभरणीला विरोध करुनसुद्धा त्याच महिन्यात घळभरणीचं काम पूर्ण करुन आपल्या कामाचा टप्पा पार पाडायचा, हे प्रशासन आणि अभियंत्यांनी ठरवलेलं होतं.

"जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा त्याबाबतची कुठलीही पुर्वसूचना ग्रामस्थांना मिळाली नाही. कुठलंही सायरन किंवा धोक्याची घंटा वाजली नाही. केवळ अतिवृष्टी हे गाव पाण्यात जाण्याचं कारण नसून बळजबरीनं केलेली घळभरणी हेच त्यामागचं कारण असल्याचं तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं."

प्रशासनाच्या वतीनं नागरिकांसाठी अशाप्रकारचे शेड उभारण्यात आलेत.फोटो स्रोत,kiran sakale

फोटो कॅप्शन,प्रशासनाच्या वतीनं नागरिकांसाठी अशाप्रकारचे शेड उभारण्यात आलेत.

हसनाळच्या ग्रामस्थांना भेटून, प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जाणून घेऊन समितीनं हा अहवाल तयार केल्याचं सारिका उबाळे यांनी सांगितलं.

दरम्यान, हसनाळमधील ग्रामस्थांना ढगफुटीसदृश्य पावसाच्या आदल्या दिवशी पूर्वसूचना दिल्याचं स्थानिक प्रशासनानं बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

पाहा सविस्तर रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)