You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई आदिवासी: बोरीवली नॅशनल पार्कमधील 56 आदिवासी पाड्यांवर असंतोष का आहे?
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवर प्रशासनाने बजावलेल्या अतिक्रमण नोटिसांमुळे तणाव निर्माण झाला आहे.
पिढ्यान्पिढ्या इथे राहतोय मग का कारवाईचा बडगा कशाला असा सवाल करत आदिवासी या कारवाईला तीव्र विरोध करत आहेत.
56 आदिवासी पाड्यांतील 385 कुटुंबांना अतिक्रमण केलेल्या जागा खाली करा अशा नोटीस आल्या आहेत. पण आपण मूळनिवासी असल्याचं सांगत आदिवासींनी वर्षानुवर्षांची कागदपत्रही दाखवली आहेत.
बीबीसी मराठीच्या टीमने नवापाडा आणि इतर पाड्यांमधील आदिवासी कुटुंबांचं म्हणणं ऐकून घेतलं. पुनर्वसनाचा लाभ मिळाल्याचा प्रशासनाचा दावा प्रत्यक्षात खोटा असल्याचं या आदिवासींचं म्हणणं आहे.
अभ्यासक आणि आदिवासी नेत्यांच्या मते, वन हक्क कायदा 2006 नुसार आदिवासी हे अतिक्रमणधारक नसून या जमिनीचे पारंपरिक हक्कधारक आहेत. त्यामुळे त्यांना बळजबरीने हटवता येत नाही, असा युक्तिवाद केला जातोय.
दुसरीकडे, नॅशनल पार्क प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा संदर्भ देत, पुनर्वसनाचा लाभ घेतल्यानंतरही काही कुटुंबांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचा दावा केला आहे.
27 जानेवारी रोजी कारवाईदरम्यान झालेल्या संघर्षानंतर सध्या कारवाईला स्थगिती देण्यात आली असून, पुढील तोडगा मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निघण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)