You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
- Author, हरीश एस. वानखेडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
'सैराट' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मास्टरपीस सिनेमा म्हणून ओळखला जातो. तो आजही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट सिनेमा आहे.
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
हा धाडसी आणि बंड करणारा वेगळा चित्रपट आहे. त्याने सिनेमा, मनोरंजन आणि चित्रपट निर्मात्यांची कलात्मक जबाबदारी यांच्यातील नात्याला नवीन अर्थ दिला.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात पारंपरिक प्रेमकथा दाखवली आहे. गावात राहणारा एक गरीब मुलगा श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो, पण त्या गावात जातीपातीची पारंपारिक व्यवस्था असते.
अशी प्रेमकथा याआधीही अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. पण 'सैराट'ने आपल्या प्रभावी वास्तववादी मांडणी, साहसी पात्रं आणि प्रामाणिक कथेमुळे प्रेक्षकांना वेगळा धक्का दिला.
या चित्रपटाच्या यशामुळे मराठी सिनेमात नवीन लाटेला सुरुवात झाली. समाजातील वंचित घटकांतील पात्रं, कथा आणि कलाकारांना चित्रपटसृष्टीत अधिक संधी मिळू लागली आणि त्यांच्या अनुभवांना अत्यंत बारकाईने दाखवलं जाऊ लागलं.
प्रेमकथा
चित्रपटातील मुख्य पात्र अर्चना म्हणजेच 'आर्ची' पाटील (रिंकू राजगुरू) ही श्रीमंत आणि उच्चवर्णीय मराठा कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या वागण्या-बोलण्यात सरंजामशाही आणि दबदबा दिसून येतो. तिचे वडील बलाढ्य जमीनदार आणि आमदार आहेत. त्यामुळे तिची ओळखही त्या कुटुंबाच्या ताकदीशी जोडलेली आहे.
पारंपरिक चित्रपटांमध्ये दाखवतात तशी आर्ची ही शांत, लाजाळू नायिका नाही. पुरुषांना आवडणाऱ्या 'स्त्री सौंदर्याची' ती चाकोरीबद्ध नायिकाही नाही. ती धाडसी, उत्साही आणि स्वतःच्या मतांवर ठामपणे उभी राहणारी मजबूत नायिका आहे.
तिची जात आणि श्रीमंतीमुळे तिला समाजात मोठा अधिकार मिळालेला असतो. त्यामुळे संकटाच्या वेळी ती धाडसाने निर्णय घेऊ शकते. ती मनाने मोकळी आणि साहसी आहे. त्यामुळे आपल्या भावना आणि इच्छांनुसार जगण्याचा ती प्रयत्न करते.
दुसरीकडे, प्रशांत 'परश्या' काळे (आकाश ठोसर) हा मासेमारी करणाऱ्या दलित समाजातील मुलगा आहे. पण चित्रपटात त्याला शक्तीहीन आणि असहाय्य म्हणून दाखवलेलं नाही. नागराज मंजुळे यांनी परश्याला रूढ समजुतींच्या विरोधात उभं करत हुशार, मनमिळावू आणि आकर्षक असा तरुण दाखवला आहे.
तो उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे आणि अभ्यासातही हुशार आहे. जातीपातीत अडकलेल्या समाजात आर्चीवर प्रेम करणं धोक्याचं ठरू शकतं, असा इशारा त्याच्या मित्रांनी त्याला देऊनही त्यानं आर्चीचा पाठलाग करणं सोडलं नाही.
दोघांचं प्रेम हळूहळू फुलतं. परंतु, आर्चीच्या कुटुंबामुळे ते उद्ध्वस्त होतं. पुढे जेव्हा त्यांचा संघर्ष सुरू होतो, तेव्हा आर्ची ठामपणे उभी राहते. तर परश्या समाजातील कठोर परिस्थितीमुळे असहाय्य, हताश वाटू लागतो.
शेवटी त्यांच्या कथेच्या दुःखद अंतामुळे जातपात आणि पितृसत्ताक विचारांनी चालणाऱ्या समाजात आंतरजातीय जोडप्यांना 'सुखाचा शेवट' मिळणं किती कठीण आहे, हे प्रेक्षकांना समजतं.
या शेवटातून जाती आधारित समाजाची क्रूरता, स्वातंत्र्य आणि समतेच्या विचारांविषयी असलेला द्वेष आणि एका धाडसी स्वप्नाचा अंत दिसून येतो.
कल्पना विरुद्ध वास्तव
'सैराट' हा प्रेमकथांच्या प्रकारातील एक वेगळा आणि धाडसी चित्रपट आहे. पारंपरिक बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रेमातील अडचणी शेवटी दूर होतात- कधी वर्गभेदावर (मुघल-ए-आझम), कधी कौटुंबिक कलह (कयामत से कयामत तक), तर कधी देशांच्या सीमांवर (वीर-झारा) मात करून प्रेम जिंकतं.
सुजाता (1959) किंवा आरक्षण (2011) सारखे काही चित्रपट जातीवर आधारित होते. परंतु, बहुतेक वेळा ते फक्त सुधारणावादाच्या दृष्टीकोनातून दाखवले गेले, समाजातील कठोर वास्तविकता आणि संघर्ष तितक्या तीव्रतेने मांडले गेले नाहीत.
मराठी चित्रपटांतील प्रेमकथांमध्येही जातीय प्रश्न प्रामाणिकपणे मांडण्याची भीती दिसत होती. मुख्य प्रवाहातील सिनेमांमध्ये क्वचित प्रसंगीच दलित समस्या (जब्बार पटेल यांच्या 'मुक्ता'प्रमाणे) दिसून येत असत.
मंजुळे यांनी या चित्रपटातून वेगळी अशी प्रभावी कथा उभी केली आणि आधीच्या प्रेमकथांमधील उथळपणा उघड केला. आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष विचार मांडणाऱ्या अनेक दिग्दर्शकांनी जाती व्यवस्थेच्या कठोर वास्तवाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं होतं, पण 'सैराट'ने ते वास्तव ठळकपणे दाखवलं.
बहुतांश चित्रपटांमध्ये लोकप्रिय सिनेमाची (हिंदी/मराठी) संस्कृती, कथनशैली आणि मुख्य पात्रं समाजातील उच्चवर्गीय किंवा अभिजात वर्गाच्या हितांभोवती फिरत असतात. त्यामुळे दलित आणि इतर वंचित समाजांच्या संस्कृती, कला आणि परंपरा चित्रपटात मागे राहतात, त्यांचा फारसा समावेश होत नाही.
'सैराट'चा अशा विलक्षण सिनेमाच्या क्षेत्रातील प्रवेश खूप धाडसी ठरला. त्याने पारंपरिक कथा सर्वांसाठी सुलभ केल्या आणि दाखवलं की, समाजातील दैनंदिन वास्तवावर आधारित कथा किती शक्तिशाली असू शकतात, त्यात किती सामर्थ्य असू शकतं.
यामुळे एक नवीन दलित नायक जन्माला आला, जो पारंपरिक शक्तिशाली नायकापासून वेगळा होता. या पात्राला प्रेम, स्वातंत्र्य आणि समानतेचा झेंडा उभारून ब्राह्मण्यवादी व सरंजामी व्यवस्थेविरोधात उभं राहण्याची संधी मिळाली.
स्त्रीवादी नायक आणि दलित पात्र
मुख्य प्रवाहातील सिनेमाचा नायक म्हणजे संकटं सोडवण्यासाठी असामान्य प्रयत्न करणारा व्यक्ती. 'सैराट'मध्ये सुरुवातीला दाखवलं जातं की, परश्या असा नायक आहे, जो क्रिकेटचे सामने जिंकतो आणि अभ्यासातही हुशार आहे.
परंतु, दिग्दर्शक त्याला लोकप्रिय सिनेमांमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जातं तसं पारंपरिक नायकासारखी सत्ता किंवा ताकद देत नाही. त्याऐवजी, त्याच्या पात्रात समाजातील कठोर वास्तव दिसतं, जिथे त्याच्या हुशारी आणि आकर्षकपणाला काहीही किंमत नसते.
परश्याच्या शांत स्वभावाच्या अगदी उलट, आर्ची सिनेमात ठाम आणि सक्रिय नायिका आहे. तिचं धैर्य स्पष्ट आणि आक्रमक आहे. त्यामुळे परश्या आणि त्याचे मित्र मागे राहतात.
यामुळे खेड्यातील मुलीला फक्त सुंदर म्हणून दाखवण्याची रूढ असलेली कल्पना मोडली जाते, पण त्याचवेळी तिच्या उच्चवर्णीय घराण्याची सत्ता तिच्या ताकदीचा स्रोत म्हणून बळकट होते.
ती आपला जातीय विशेषाधिकार, सरंजामी अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य स्पष्टपणे दाखवण्यास अजिबात संकोच करत नाही आणि पारंपरिक व्यवस्थेला आव्हानही देते.
आर्चीला पारंपरिक पितृसत्तात्मक रूढींपासून मुक्त झालेलं दाखवलं आहे, पण परश्याला जाती समाजाच्या पारंपरिक व्यवस्थेमध्ये दबावाखाली आणि कमकुवत पात्र म्हणून चित्रित केलं आहे.
इथेच चित्रपटाला दलित नायक म्हणून दाखवण्यात काही मर्यादा येते. 'दलित नायक' होण्याची संधी पूर्णपणे साकारली जात नाही, कारण तो अजूनही घराणेशाही, सरंजामी व्यवस्थेच्या वास्तवात खोलवर गुंतलेला आहे.
खलनायकाचा मुकाबला करणाऱ्या नायकाऐवजी, परश्या हा पलायनवादी, नायक नसलेला पात्र बनतो. त्याची सौम्यता त्याला 'मेट्रोसेक्शुअल' बनवते, सामाजिक बांधिलकीपासून दूर असलेलं स्वतः मध्येच मग्न असलेलं पात्र.
असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की, जातीय रूढी कथेपेक्षा जास्त प्रभावी आहेत. दलित पात्र खूप प्रयत्न करूनही शेवटी तो अपयशी ठरतो आणि खरा नायक होऊ शकत नाही. तेजस्वी नायक म्हणून उदयास येण्याची शक्यता अशक्य आहे.
दलित नायकाचे आगमन
'सैराट' हा चित्रपट त्या पारंपरिक संस्कृतीच्या नियमांचा विरोध करतो, जे सामान्य मनोरंजनावर वर्चस्व ठेवतात.
मंजुळे यांनी दलित आणि स्त्रीवादी आवाजांना केंद्रस्थानी ठेवून, भारतीय कथाकथनाच्या पारंपरिक पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला, जिथे साधारणपणे पुरुष नायक जिंकल्याने उच्चवर्णीय सत्ता कायम राहते.
'सैराट'मध्ये परश्या हा दलित नायक खरा शक्तिशाली नायक नाही; तो 'मृदू' आणि जवळजवळ मेट्रोसेक्शुअल दाखवला आहे आणि शेवटी ब्राह्मण्यवादी जातीव्यवस्थेचा तो बळी ठरतो. पण त्यानंतरच्या सिनेमांनी हे अडथळे मोडले आहेत.
'सैराट'ने चित्रपटसृष्टीला नवीन दिशा दिली. त्यानंतर आलेले चित्रपट दलितांचा अनुभव अधिक स्पष्टपणे दाखवू लागले.
गेल्या 10 वर्षांमध्ये 'सैराट'मुळे अनेक चित्रपट आले ज्यात अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि हिंसाचार यांसारख्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
असे सिनेमे प्रेक्षकांना दलित पात्र फक्त जातीय उतरंडीचा बळी म्हणून नव्हे, तर स्वातंत्र्य आणि समान हक्कांसाठी लढणारा नायक म्हणून अनुभवायला लावतात.
2020 च्या दशकात आम्ही धाडसी, खंबीर दलित नायक पाहिले. विशेषतः तामिळ चित्रपट जसे 'सरपट्टा परंबराई', 'असुरन', 'मामन्नन' आणि अलीकडील हिंदी चित्रपट जसे 'मॅडम चीफ मिनिस्टर', 'भीड', 'होमबाउंड' हे 'पीडित कथे'च्या पुढे गेले आहेत.
परश्या जसा आर्चीच्या सरंजामी आत्मविश्वासाच्या सावलीत राहतो, त्याच्या उलट हे नवे नायक आपला इतिहास आणि जागा परत मिळवतात आणि बुद्धी व ताकद वापरून आपली लढाई जिंकतात.
10 वर्षांनंतर 'सैराट' पाहिल्यास असं दिसतं की, हा चित्रपट प्रेक्षकांना थोडा 'बाह्य दृष्टिकोनातून अनुभवण्याचा आनंद' (व्हॉयरिस्टिक प्लेजर) देतो- जिथे प्रेक्षक शोषित लोकांचं दु:ख आणि सरंजामशाही सत्तेविरुद्ध त्यांची असहाय्यता अनुभवतात.
तरीही 'सैराट'ने एक आशादायी आणि चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे 'दलित-बहुजन' चित्रपटांचा नवीन प्रकार तयार होण्याची शक्यता निर्माण झाली असं म्हणता येईल.
आज या प्रकाराला 'अधिकाराचा किंवा प्रतिपादनाचा सिनेमा' म्हणता येईल. जिथे 'सैराट'ने समस्या ठामपणे मांडली होती, तिथे 2020 च्या मधल्या दशकातील नवीन चित्रपट त्यावर उपाय शोधत आहेत.
परश्या आपल्या 'जातीच्या चौकटीत' मर्यादित होता, पण आजचे दलित पात्रं त्या चौकटीतून बाहेर पडताना दाखवले जात आहेत, फक्त बंडखोर म्हणून नव्हे, तर जिंकणारे नायक म्हणूनही.
आता चित्रपटांनी प्रेक्षकांना धाडसी कल्पनाशक्ती आणि स्वप्नाळू गोष्टी, परीकथा दाखवण्याची संधी दलितांनाही दिली आहे.
'सैराट' आजही सामाजिक वास्तवादाचा उत्कृष्ट सिनेमा आहे, पण आता तो एक पायरी बनून उभा राहिला आहे. त्याने अशा परिपक्व, बिनधास्त दलित नायकासाठी मार्ग मोकळा केला आहे, जो आता मोठा बदल घडवण्यासाठी कुणाची परवानगी न घेता पुढे येऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)