ऋषी कपूर यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

वाचन वेळ: 3 मिनिटे

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून ल्युकेमिया आजाराशी लढत होते. काल तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आज सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. ऋषी कपूर मृत्यूसमयी 67 वर्षांचे होते.

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या ऋषी कपूर यांनी दोन एप्रिलनंतर ट्विटरवर कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्यामुळे त्यांची प्रकृती नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

ऋषी कपूर हे रुग्णालयात असल्याचं आणि कॅन्सरशी झुंज देत असल्याचं रणधीर कपूर यांनी बुधवारी सांगितलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही दोनवेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ऋषी कपूर दिग्गज अभिनेते राज कपूर यांचे द्वितीय पुत्र होते. ऋषी कपूर यांना दोन भाऊ रणधीर कपूर आणि राजीव कपूर आहेत. तर ऋतू नंदा आणि रिमा जैन या दोन बहिणी आहेत.

ऋषी कपूर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1973 साली बॉबी या चित्रपटातून केली होती. याशिवाय ते बालकलाकार म्हणून श्री 420 आणि मेरा नाम जोकर चित्रपटातही दिसले होते. इमरान हाश्मीसोबतचा द बॉडी हा चित्रपट ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत द इंटर्न या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये आपण काम करणार असल्याची घोषणाही ऋषी कपूर यांनी केली होती. पण हा चित्रपट आता त्यांच्याशिवाय होईल.

ऋषी कपूर यांना कोणता आजार होता?

दोन वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. 2018 मध्ये उपचारासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. अनेक महिने उपचार घेतल्यानंतर 2019 मध्ये ते पुन्हा भारतात परतले. यानंतरसुद्धा त्यांना सातत्याने हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत होत्या. फेब्रुवारी महिन्यातही ते दोनवेळा रुग्णालयात दाखल झाले होते.

सिनेजगत शोकाकूल

ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेत राहुल गांधी यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं.

गायिका लता मंगेशकर यांनी ट्विट करून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेते अक्षय कुमार यांनी ऋषी कपूर यांचं जाणं अतिशय अस्वस्थ करणारी बातमी असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेते अजय देवगण यांनीही त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं.

हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं - उपमुख्यमंत्री अजित पवारज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. 'कपूर' कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं.

काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते.

भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांच्या निधनाचं दु:ख सहन करण्याचं बळ कपूर कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)