अली अकबर : केरळमधल्या फिल्म निर्मात्याने इस्लाम सोडून हिंदू धर्म का स्वीकारला?

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

केरळमधले सिने निर्माते अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचं नवीन नाव राम सिंहम असेल. जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर काही लोकांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिल्या त्यावरून व्यथित होत आपण हिंदू धर्म स्वीकारण्याचं ठरवल्याचं अली अकबर यांचं म्हणणं आहे.

जनरल रावत यांच्या मृत्यूच्या बातमीवर सोशल मीडियावर काही लोकांनी हसणाऱ्या इमोजींचा वापर केल्याचं आपल्याला दुःख झाल्याचं अली अकबर म्हणतात.

बीबीसीशी बोलताना अली अकबर यांनी सांगितलं, "रावत यांच्या मृत्यूनंतर अनेक लोकांनी हसत असल्याचा इमोजी वापरला. ही अतिशय वाईट गोष्ट होती. तुम्ही सोशल मीडियावर अशा लोकांची नावं पाहू शकता. ते सगळे मुसलमान आहेत. आपण सगळे फक्त आपल्या धर्माला सगळ्यात जास्त प्राधान्य देऊन कसे जगू शकतो? माझ्यासाठी धर्म तिसऱ्या क्रमांकावर येतो. पहिल्या क्रमांकावर माझा देश आहे, दुसऱ्या क्रमांकावरही माझा देशच आहे आणि मग तिसऱ्या क्रमांकावर धर्म येतो."

जनरल रावत यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि कट्टरतावाद्यांच्या विरोधात कारवाई केली होती म्हणून त्यांच्या निधनावर अशा प्रतिक्रिया आल्याचं अली अकबर यांचं म्हणणं आहे.

हताश दिसणाऱ्या 59 वर्षांच्या अली अकबर यांनी सांगितलं, "कोणत्याही मुसलमान नेत्याने अशा लोकांच्या विरोधात तोंड उघडलं नाही आणि अशा प्रकारच्या पोस्ट करू नयेत असं सांगितलं नाही. केरळमधलं इस्लामिक आंदोलन आता इस्लामिक राहिलेलं नाही. आता त्यांना केरळला एक इस्लामी राज्य बनवायचं आहे. काही नेत्यांनी तर हे सार्वजनिकरित्या बोलून दाखवलं आहे."

अकबर यांनी '1921...फ्रॉम रिव्हर टू रिव्हर' या सिनेमाची घोषणा केली होती. मलाबार प्रदेशामध्ये ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध झालेलं बंड ही खरंतर एक जातीय दंगल होती आणि यामध्ये मुसलमानांनी हिंदूचा नरसंहार केला, हे त्यांना या चित्रपटाद्वारे मांडायचं होतं.

अनेक घटनांचा दाखला

"ते (मुस्लिम नेते) गेल्या वर्षभरापासून माझ्या मागे आहेत. समाजाला हे सत्य कळावं, अशी त्यांची इच्छा नाही. मी आता हा सिनेमा पूर्ण केलाय आणि पुढच्याच महिन्यात तो रीलिज करणार आहे."

अली अकबर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. जन्मावेळी आपल्याला घालण्यात आलेली वस्त्रं आपण उतरवत असल्याचं यामध्ये त्यांनी म्हटलंय.

अली अकबर यांनी म्हटलंय, "आजपासून मी भारतीय आहे. ज्या लोकांनी भारताच्या विरुद्ध हसणारे हजारो इमोजी प्रसिद्ध केलेत, त्यांना माझं हे उत्तर आहे."

पण या व्हिडिओवर प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ काढून टाकला.

आपल्याला कोणकोणत्या घटनांमुळे दुःख झालं ज्यामुळे आपण इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतला, त्याविषयी अकबर सांगतात

ते म्हणतात, "पालामध्ये एक गाव आहे जिथे बहुतेकजण ख्रिश्चन आहेत. इथे एक मोठं चर्चही आहे. इथल्या कट्टरवादी मुसलमानांना गावाचं इरितिपेटा नाव बदलून अरुवीधुरा करायचं आहे. त्यांना हे नाव बदलयाचंय कारण हा एक ख्रिश्चन भाग आहे."

केरळमध्ये 1970च्या दशकात इस्लामीकरणाची मोहीम सुरू झाली आणि यासाठी आखाती देशांतून येणारा पैसा वापरण्यात येत असल्याचा आरोप अली अकबर करतात.

ते म्हणतात, "पण सरकार यासाठी कारणीभूत लोकांवर कोणतीही कारवाई करत नाही. मी दशकभरापूर्वी कुवेतमध्ये रहात असताना याबद्दल तक्रार केली होती. तेव्हाही मी या लोकांच्या 'लव्ह जिहाद' आणि 'हलाल जिहाद' बद्दल इशारा दिला होता."

अकबर म्हणतात, "मी इशारा दिला होता एक वेळ अशी येईल जेव्हा इतर धर्मांचे लोक मुसलमानांसोबत बसणं - बोलणं सोडून देतील. आता असं वातावरण निर्माण झालंय जिकडे मुसलमानांकडे संशयाने पाहिलं जातंय. जर कोणी आपल्या धर्मासोबत काही चुकीचं करत असेल तर ज्येष्ठ नेत्यांना यासाठी जबाबदार ठरवायला हवं. त्यांनी या विरोधात मोहीम चालवायला हवी. इथे नेतृत्त्वाकडून काहीही दायित्व स्वीकारलं जात नाही."

अकबर आणि त्यांच्या ख्रिश्चन पत्नी लुसीअम्मा पुढच्या आठवड्यात आर्य समाजाच्या मार्फत नवीन धर्मात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. पुढच्या 20 दिवसांत हिंदू धर्म स्वीकारण्याचा त्यांचा बेत आहे.

अकबर यांना 30 आणि 25 वर्षांची दोन मुलं आहेत आणि ती मुसलमान असल्याचं ते सांगततात. आपली मुलं सुजाण असून ती स्वतःचा धर्म निवडू शकतात असं ते सांगतात.

हिंदू धर्मच का?

अली अकबर म्हणतात, "कारण हिंदुत्व एक धर्म नाही तर एक संस्कृती आहे. इथे नरकात जाण्याची भीती नाही. तुम्ही माणसासारखं राहू शकता कारण देव तुमच्यात आहे. देव आपल्यातच वसतो हा यातला सर्वोच्च विचार आहे."

आपलं नाव राम सिंहम ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणारे केरळमधले ते पहिले व्यक्ती असल्याचा त्यांचा दावा आहे.

अली अकबर म्हणतात, "राम सिंहम हे केरळमधले हिंदू धर्म स्वीकारणारे पहिले मुसलमान होते. ऑगस्ट 1947मध्ये भारत स्वतंत्र होण्याची काहीच दिवस आधी त्यांची हत्या करण्यात आली होती."

इस्लाम विचारसरणीच्या लोकांवर टीका केल्याने अकबर यापूर्वीही वादात सापडले होते. 2018मध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. संगीतकार ए. आर. रहमान यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचं उदाहरण देऊन मुसलमान हिंदूंना धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं.

मदरशातल्या त्यांच्या शिक्षकांनी त्यांचं शोषण केलं होतं, असा आरोपही त्यांनी याच्या तीन वर्षांपूर्वी केला होता.

तुम्ही आरएसएसच्या विचारसरणीनुसार काम करत असल्याचा आरोप तुमच्यावर केला जातो, असं विचारल्यावर ते सांगतात, "मी ती विचारसरणी का अवलंबू नये? आरएसएस भारतातली एक सांस्कृतिक शाखा आहे. आरएसएसमध्ये एक मुस्लिम मंचही आहे. ही एक राष्ट्रवादी संघटना आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)