अशोक स्तंभ: बोधचिन्ह साकारणारे सुनील देवरे म्हणतात, एकही बदल केलेला नाही

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी जगताप
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

नवीन संसदेच्या आवारात उभारण्यात आलेलं बोधचिन्ह शिल्पकार सुनील देवरे यांनी साकारलं आहे. बोधचिन्हातील सिंहाच्या मूळ रचनेत बदल केल्याचा आरोप सध्या मोदी सरकारवर होतोय. परंतु शिल्पकार सुनील देवरे यांनी कोणताही बदल केला नाही असं म्हटलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "बदल केलाय हे मला मान्य नाही. टीका झाली तशा शुभेच्छाही खूप देत आहेत. सारनाथला जो मूळ अशोकस्तंभ आहे तो 35% डॅमेज आहे. त्याचा आम्ही 360 डिग्री अभ्यास केला. त्याचं की मॉडेल (प्रतिकृती) बनवलं. ते मी प्रोजेक्ट हेडला दिलं, ते अंतिम केलं."

ते पुढे सांगतात, "आता जो फोटो व्हायरल होतोय त्याचा अँगल वाईड आहे. संसदेत आजूबाजूला जी बालकनी आहे ती 5-7 फूट आहे. तिथून वाईड अँगलने फोटो घेतला आहे."

शिवाय, एएसआयने (Archeology survey of India) रिपोर्ट केलाय की मूळ अशोकस्तंभातही सिंहाचा जबडा उघडा आहे, सुळे दिसतायत असा दावाही त्यांनी केला.

"अशोकस्तंभाखालील कमळ आपण केलं नाही तर तो 3.5 ते 4 फूट आहे. त्यामुळे आपण ते बीलो आय लेव्हल पाहतो. स्क्लप्चरचा ड्रोन व्ह्यू बघा, मी कलाकार म्हणून सांगतोय काहीही बदल झालेला नाही. टीका का होतेय हे माझ्या समजण्यापलीकडे आहे." असंही देवरे यांनी स्पष्ट केलं.

9.5 टनचं शिल्प पूर्ण साकारण्यासाठी सुनील देवरे आणि त्यांच्या टीमला 9 महिने लागले.

हे काम आपल्यासाठी आव्हानात्मक होतं असं ते सांगतात.

"आमच्यासाठी हे एक मिशन होतं. टॉवर क्रेनची मर्यादा दीड टनपर्यंत होती त्यामुळे वेगवेगळ्या पार्टमध्ये ते आम्हाला करावं लागलं. ब्रिजिंग, कास्टिंग जयपूरला केलं. क्ले मॉडेल औरंगाबाद येथे केलं. 45-50 डिग्री तापमानात आम्ही जोड काम केलं. त्यामुळे टीका करताना या पार्श्वभूमीचाही अभ्यास करा." असं सुनील देवरे सुचवतात.

सिंहाचं तोंड उघडं असल्याने सुळे तर दिसणारच असंही ते म्हणाले.

'पंतप्रधान मोदींनी केलंअभिनंदन '

ही रचना साकरण्यापूर्वी केंद्र सरकार किंवा प्रशासनाकडून कोणत्या प्रतिनिधींशी चर्चा झाली होती का?

या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "हे काम करण्यापूर्वी सरकार किंवा प्रशासनाकडून मला कोणतीही अशी सूचना नव्हती. शिल्पकार आणि वास्तू शिल्पकार यांचं काम होतं. वास्तू शिल्पकार बघायला यायचे. करेक्शन सांगायचे. असं काम पूर्ण केलं."

अशोकस्तंभाचे मूळ शिल्प आणि तुम्ही साकारलेलं शिल्प यात बरीच तफावत आहे अशी टीका का होतेय? यावर ते म्हणतात, "फोटोचा अँगल आणि शिल्पाची भव्यता याचा फरक पडतो. संग्रहालयातील लाईट्स आणि सन लाईट याचाही फरक पडतो. शिल्प मोठं होतं तेव्हा डेप्थ तयार होते. मी कुठलाही, कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मग ही टीका राजकीय आहे असं वाटतं का? ते म्हणाले, "राजकीय टीका आहे का हे मला माहिती नाही. मी कलाकार आहे आणि कलाकार म्हणूनच जगण्याचा माझा मानस आहे. माझ्यासाठी हे एक गौरवास्पद काम होतं. मी हे राष्ट्रासाठी करतोय अशी भावना होती. आईला आपल्या मुलाला पाहते तेव्हा ज्या भावना असतात त्याच भावनेने कलाकार आपलं शिल्प पाहत असतो."

परंतु अशा प्रकारे टीका होतेय याचं वाईट वाटतं. असं व्हायला नको होतं. लोकांनी अभ्यास करून बोलायला हवं असं सुनील देवरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या आवारातील या बोधचिन्हाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं असं सुनील देवरे यांनी सांगितलं.

दरम्यान नव्या संसदेच्या आवारातील कांस्य बोधचिन्हाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी झालं. 6.5 मीटर (21 फूट) उंच अशा या बोधचिन्हात चार आशियाई सिंह आहेत. या बोधचिन्हाचं वजन साडेनऊ हजार किलो इतकं आहे.

इसवी सन पूर्व 250 काळातील अशोकाच्या स्तंभावरून घेण्यात आलेल्या या बोधचिन्हावरून वादाला तोंड फुटलं आहे.

बोधचिन्हातील सिंहाचा नवा अवतार हा उग्र आणि आक्रमक आहे आणि मूळ बोधचिन्हात बदल करण्यात आला आहे, अशी टीका होऊ लागली आहे. पंतप्रधान मोदींनी बोधचिन्हाच्या अनावरणाचा व्हीडिओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. नव्या संसद भवनात हे बोधचिन्ह विराजमान असणार आहे.

सम्राट अशोक यांच्या साम्राज्यात स्तंभावर हे सिंहांचं बोधचिन्ह तयार करण्यात आलं होतं. सम्राट अशोकाच्या राजवटीत हे बोधचिन्ह महत्त्वाचा मानबिंदू होता असं एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं.

सोशल मीडियावर टीका

परंतु पंतप्रधान मोदींनी नव्या संसदेच्या आवारातील बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर सोशल मीडियावरून सिंहांच्या नव्या अवताराबाबत टीका केली आहे. सम्राट अशोकाच्या काळातील बोधचिन्हामधील सिंह हे शौर्याचं प्रतीक होतं. पण आता हे सिंह उग्ररुपातले असून ते रागाने गुरगुरत आहेत असं वाटतं.

अशोकाच्या काळातील सिंहांना नवं रूप देण्यात आलं असून, आता ते दात विचकणारे सिंह झाले आहेत असं एका नेटिझनने म्हटलं आहे.

प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी मात्र या बोधचिन्हावर टीका करणाऱ्यांवरच निशाणा साधला आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, " हे सिंह गर्जना करण्याचं धाडस कसं करू शकतात ? त्यांनी आपल्या पायाशी निमूट बसणाऱ्या मेंढ्यासारखं वागायला नको का, म्हणजे त्यांचा आपण बळी देऊ शकतो? एक चहावाला पंतप्रधान बनण्याचं धाडस कसं करू शकतो? त्याने आपल्या मालकाच्या आज्ञेतच राहायला नको का?"

मोदी सरकारने ब्रिटिशांच्या काळातील वास्तूंच्या नूतनीकरणाचा घाट घातला असून याअंतर्गत संसदेची नवी इमारत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 200 अब्ज रुपये एवढा असणार आहे.

विरोधी पक्षांनी या प्रकल्पाच्या खर्चासाठी तसंच याच्या प्रारुपाबद्दल मोदी सरकारवर टीका केली आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलं की "पंतप्रधान मोदी यांनी बोधचिन्हाचे अनावरण करणे ही घटनेची पायमल्ली आहे. कायदेमंडळ आणि कार्यकारिणी यांच्यात निर्णयांचं विभाजन होतं."

बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधान मोदींनी पूजा केली. हा हिंदू संस्कृतीतील परंपरेचा भाग आहे. यावरही येचुरी यांनी टीका केली आहे. बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं नाही, असं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित ऑगस्ट 2022 पर्यंत नव्या संसदेचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण अधिकाऱ्यांनी या वास्तूचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल असं स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)