ओसामा बिन लादेनच्या मुलावर 10 लाख डॉलरचं बक्षीस

वाचन वेळ: 2 मिनिटे

2011मध्ये अमेरिकेनं ठार केलेला अल-कायदा समूहाचा नेता ओसामा बिन लादेनचा मुलगा हामझा बिन लादेन हा अल-कायदाचा उगवता नेता म्हणून ओळखला जात असल्याचं अमेरिकेन सरकारनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हामझाची माहिती देणाऱ्यास 10 लाख डॉलरचं बक्षीस देण्यात येईल असं अमेरिकेनं जाहीर केलं आहे.

हामझा बिन लादेन अल कायदामध्ये सक्रिय झाला आहे आणि त्याच्या दहशतवादी कारवाया सुरू झाल्या असल्याची माहिती गुप्तहेर खात्यांकडे आली आहे.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घ्या असं आवाहन त्यानं व्हीडिओतून केलं होतं. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांवर हल्ले करा असं तो या व्हीडिओत सांगतो.

हामझा बिन लादेनबद्दल काय माहिती आहे?

हामझा बिन लादेन हा 30 वर्षांचा असावा असा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेनं त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं.

2001 साली ज्या चार विमानांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यापैकी एका विमानाचं अपहरण मोहम्मद आट्टाने केलं होतं. त्या आट्टाच्या मुलीसोबत हामझानं लग्न केलं आहे, अशी माहिती गुप्तहेर खात्याकडे आहे.

ओसामा बिन लादेनवर जेव्हा कारवाई करण्यात आली त्यावेळी अमेरिकेच्या हाती जी कागदपत्रं लागली होती त्यातून असं समजलं आहे की ओसामा बिन लादेननं आपला मुलगा हामझा लादेनला अल-कायदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.

अल कायदाचा भविष्यातला नेता म्हणून त्याची तो तयारी करून घेऊ लागला होता. हामझा हा त्याचा सर्वांत लाडका मुलगा होता म्हणून तो त्याला नेतृत्वासाठी तयार करू लागला होता.

हामझा आपल्या आई बरोबर वर्षभर इराणमध्ये होता. त्याच ठिकाणी त्याचं लग्न ठरलं. काही रिपोर्ट्स असं देखील म्हणत आहेत की तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरियामध्ये होता.

हामझा सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर असावा आणि तो इराणमध्ये जाऊ शकतो पण तो दक्षिण मध्य आशियात कुठेही असू शकतो, असं असिस्टंट सेक्रेटरी फॉर डिप्लोमॅटिक सेक्युरिटी मायकल इव्हानॉफ यांनी सांगितलं.

ओसामाच्या मृत्यूनंतर अल-कायदाचं काय झालं?

2001मध्ये अमेरिकेत दहशतवादी हल्ले झाल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी तळांवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यामुळे तालिबानची वाताहत झाली, पण त्याच बरोबर ओसामा बिन लादेन आणि त्याची संघटना फोफावली.

आयसिसच्या उत्कर्षानंतर अल कायदा ही संघटना काहीशी मागे पडली. आयसिसकडेच निधी आणि लढवय्ये वळू लागले. त्यांनी पाश्चिमात्य देशात अनेक हल्ले घडवून आणले.

आयसिसच्या उत्कर्षानंतर अल कायदा शांत झालं का असं विचारलं असता तज्ज्ञ सांगतात हे त्यांचं धोरण आहे. "गेल्या काही वर्षांत अल-कायदा तुलनेनं शांत वाटत आहे, पण हे त्यांचं धोरण असू शकतं. त्यांचं समर्पण नाही." असं अमेरिकेचे दहशतवाद विरोधी समन्वयक नाथन सेल्स सांगतात.

"सध्या अल कायदा स्थिर बसलेलं नाही. ते त्यांच्या संघटनेची पुनर्बांधणी करत आहेत. ते अमेरिकेला आणि त्यांच्या मित्र देशांना अजूनही धमक्या देत असतात. लक्षात घ्या अल कायदाकडे आपल्यावर हल्ला करायची क्षमता आणि उद्दिष्ट दोन्ही आहे," सेल्स सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)