कोरोना व्हायरस : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करतंय?

वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला आलेली पीकं मार्केटला घेऊन जाताना अडचणी येत आहेत.

एकीकडे वाहतुकीचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे बाजार समित्या बंद असल्यामुळे मार्केटमधील माल विकता येत नाही, अशा कात्रीत शेतकरी अडकला आहे. या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांसाठी नेमकं काय उपाययोजना करत आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या श्रीकांत बंगाळे यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला.

दादा भुसे यांच्या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.

प्रश्न - लॉकडाऊनच्या काळात शेती करण्याची परवानगी आहे का?

भुसे - शेती करण्याला अडचण नाही. शेतीसंबंधित बी-बियाणं खतं, यांच्या वाहतुकीला कुठलीही अडचण नाही. सोशल डिस्टन्स ठेवून कामगारांचा, मजुरांचा वापर शेतकरी करू शकतो. शेतीमाल वाहतुकीलाही प्रॉब्लेम नाही.

प्रश्न - एकीकडे सोशल डिस्टन्सिंग, जमाबंदीचे आदेश आहेत, आणि दुसरीकडे शेती करा, असंही सांगितलं जात आहे, मग नेमकी शेती करायची कशी?

भुसे - कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण आहे त्या प्राप्त परिस्थितीत दोघांमध्ये एक ते दीड मीटरचं अंतर ठेवून काम करावं लागेल. मजुरांची शेतात राहण्याची व्यवस्था करता येईल का, यासंबंधी विचारविनियम करणं गरजेचं आहे.

प्रश्न - नाशवंत पीक काढणीला आली होती. पण सध्या ती लॉकडाऊनमुळे शेतातच सडून चालली आहे. या पिकांविषयी सरकारचं नेमकं काय धोरण असेल?

भुसे - काही पीक काढणीला आलेली असताना लॉकडाऊनची परिस्थिती ओढवल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च निघू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण शेतातील भाजीपाला, फळं विक्रीला अडचण नाही.

काही ठिकाणी बाजार समित्या सुरू आहेत, काही शेतकरी स्वत:हून मालाची विक्री करत आहेत. द्राक्ष, संत्रा, मोसंबी, केळी, आंबा यांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी आस्वाद घ्यावा, अशी आमची विनंती आहे.

प्रश्न - माल वाहतूक करताना शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

भुसे - सुरुवातीच्या एक-दोन दिवस या समस्या निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. पण गेल्या 8 दिवसांपासून शेती मालाच्या वाहतुकीला काहीही अडचण येत नाहीये.

प्रश्न - ज्या शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं पीक शेतात आहे, त्यांना ठोस काही मदत देणार का?

उत्तर - लॉकडाऊन दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याची नोंद घेण्याचं काम कृषी विभाग करत आहे. लगेच नुकसान भरपाई देण्यात येईल की नाही, ते सांगता येणार नाही. पण शासनाकडे काहीतरी नोंद असली पाहिजे. त्यामुळे कृषी विभाग त्याप्रकारची नोंद घेत आहे.

प्रश्न- एकीकडे पिकवलेला माल शेतात नेता येत नाही आणि नेलेला माल बाजार समित्या बंद असल्यामुळे विकला जात नाही, या कात्रीत शेतकरी सापडला आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र पॅकेज जाहीर करणार का?

भुसे - याविषयी आताच घोषणा करणार उचित होणार नाही. पण शेतकऱ्यांच्या स्थितीविषयी केंद्र आणि राज्य सरकारला माहिती आहे. एकदा कोरोनाची परिस्थिती निवळली की, परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

प्रश्न - कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांनी त्यांचं निराकरण करण्यासाठी कुठे संपर्क साधायचा?

भुसे - 9422270593 हा माझा मोबाईल क्रमांक आहे. चोवीस तास हा मोबाईल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. शेतकरी काही प्रश्न किंवा अडचण असल्यास मला थेट फोन करू शकतात.

प्रश्न - राज्यातील अनेक शेतकरी स्वत:च्या शेतातील पीक उद्ध्वस्त करत आहेत. यामध्ये द्राक्ष, संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त केल्याचे व्हीडिओ समोर येत आहे. या शेतकऱ्यांना कृषी मंत्री म्हणून काय सांगाल?

भुसे - शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की खचू नका, जास्तीत जास्त मार्ग काढण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. सरकार शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)