उद्धव ठाकरे: 'थकबाकी भरलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात 50 टक्के सूट'

वाचन वेळ: 1 मिनिटे

कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना 50 टक्के वीज बिल माफी मिळणार, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वीजेसंदर्भात तसेच पंप कनेक्शनसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

"2018 नंतर कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येत नव्हते आता नवे धोरण आणले आहे, त्यानुसार कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येईल," असे तनपुरेंनी सांगितले.

"शेतकर्‍यांकडे 40 हजार कोटींची थकबाकी आहे, त्यांना डिले चार्जेस लावण्यात येणार नाहीत," असंही त्यांनी सांगितले.

"दरवर्षी किमान एक लाख शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी अर्ज करतात. पण यावर्षी 2 लाखाच्या वर कृषी कनेक्शन द्यायचे आहेत ते दिले जातील," असे तनपुरे यांनी सांगितले.

दरम्यान, वाढीव वीज बिलावरून राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी वीज बिलावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

"ज्या लोकांना वाढीव बिल आले आहे त्यांनी भरू नये तसेच ज्यांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी कुणी आले तर मनसे त्यांना उत्तर देईल," असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

मनसेनी राज्य सरकारला सोमवारपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)